औंध :
माजी पंतप्रधान श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त ‘काव्य अटल’ उपक्रमांतर्गत त्यांच्या ‘मेरी इक्यावन्न कवितांए’ हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रहातील काही निवडक कवितांचे अभिवाचन आणि प्रदर्शन औंध येथे माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला.
या कार्यक्रमाची माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न, श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांचाही वाढदिवस आहे. कुशल नेतृत्व, सर्वसमावेशक वृत्ती, अजोड वक्तृत्व, मृदू आणि प्रसंगी करारी बाणा, अफाट राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रासाठी समर्पित आयुष्य यामुळे अटलजी यांना देश विदेशात मानाचे एक आगळे वेगळे स्थान आहे. यामुळे त्यांच्या प्रसिद्ध कवितांचा कार्यक्रम भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त औंध या ठिकाणी संपन्न झाला.
औंध येथील आयटीआय रस्त्यावर हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन औंध नगर सर संघचालक अविनाश भालेकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी माजी महापौर दत्ताजी गायकवाड, राष्ट्रीय सेविका समिती विद्यापीठ भाग कार्यवाहिका सुधा ताथोडे, जनसेवा बॅंकेचे अध्यक्ष सतीश गोरडे, राष्ट्रीय सेविका समिती पौरोहित्य विभाग प्रमुख लक्ष्मीताई पानट, संस्कार भारती विद्यापीठ विभाग प्रमुख आनंद तेलंग, पुणे मनपा स्विकृत सदस्य वसंतराव जुनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
नरेश गुंड यांनी आपल्या भारदस्त आवाजात कवितांचे अभिवाचन केले. तर गणेश कलापुरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि विश्लेषण केले. या कार्यक्रमाचे आयोजन सुप्रीम चोंधे, गणेश कलापुरे यांनी केले होते. कार्यक्रमाचे निमंत्रक माजी नगरसेवक सनी निम्हण होते.