पाचव्या कसोटीत पराभवाबरोबरच भारताची आयसीसी कसोटी जागतिक अजिंक्यपद शर्यत खडतर

0

इंग्लंड :

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात झालेल्या एजबस्टन कसोटीमध्ये यजमान संघाने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. यामुळे पाच सामन्यांची ही बहुप्रतिक्षीत कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली आहे.

या पराभवाबरोबरच भारताची आयसीसी कसोटी जागतिक अजिंक्यपद २०२३ची शर्यत अजून खडतर झाली आहे. इंग्लंडचा संघ आधीच कसोटी चॅम्पियनशीपमधून बाहेर पडला आहे. भारताला या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर पुढील सामने जिंकणे आवश्यक आहे.

या सामन्याआधी भारताची टक्केवारी ५८.३३ एवढी होती. आता इंग्लंड विरुद्धच्या पराभवानंतर भारताची टक्केवारी ५३.४७ एवढी झाली आहे. सध्या भारत क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. भारताला अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर पुढील सर्व सामने जिंकणे अत्यावश्यक आहे. इंग्लंडच्या संघाची टक्केवारी ३३.३३ असून ते क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. यामुळे ते आधीच स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

दुसऱ्या कसोटी चॅम्पियनशीपमध्ये भारताचे सहा सामने खेळायचे बाकी आहेत. भारताने हे सर्व सहा सामने जिंकले तर ते अंतिम फेरीत पोहोचू शकतात. भारत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया फेब्रुवारी-मार्च २०२३मध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तर बांगलादेश विरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहेत. या सामन्यांचे यजमानपद बांगलादेशकडे असणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २८४ धावांवरच सर्वबाद झाला. भारताने दुसऱ्या डावात २४५ करत इंग्लंडसमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताने ऍलेक्स लीस आणि झॅक क्राउले यांच्या पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. हे दोघे बाद झाल्यावर ओली पोपदेखील शून्यावर बाद झाला. त्यानंतर जो रूट (Joe Root) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) या जोडीने मैदानावर तळ ठोकला.

पाचव्या दिवशी रूट- बेयरस्टो जोडीने पुढे खेळ करत २६९ धावांची भागीदारी पूर्ण केली. त्यांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत अप्रतिम शॉट्स खेळले आहेत. दोघांनीही ७५ पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. इंग्लंडचा हा कसोटी इतिहासातील त्यांच्या सर्वोत्तम पाठलाग ठरला आहे.

See also  पाकिस्तानचा गोलंदाज खेळणार पुण्याच्या टीम मध्ये..