मुंबई इंडियन चा सलग सहावा पराभव….

0

मुंबई :

आयपीएलचा १५वा हंगाम मुंबई-पुण्यात खेळवला जात असूनही पाच वेळा विजेतपद पटकावणाऱ्या मुंबई इडियन्सला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. विजयासाठी आसुसलेल्या मुंबईचा सलग सहावा पराभव झाला.

त्यामुळे मुंबई या हंगामातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

शनिवारी मुंबई आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने धुवांधार फलंदाजी करत शतक झळकावलं. राहुलच्या शतकाच्या जोरावर लखनौने विजय मिळवला. दुसरीकडे आयपीएलच्या प्ले ऑफच्या स्पर्धेतून मुंबई बाहेर पडण्याच्या समीप उभी ठाकली आहे.

लखनौने दिलेल्या २०० धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरूवात निराशाजनक राहिली. कर्णधार रोहित शर्मा आणि इतर वरच्या फळीतील फलंदाज संघाची धावसंख्या ५७ असतानाच तबूंत परतले होते. ईशान किशन (१३ धावा), रोहित शर्मा (६ धावा), ब्रेवीस (३१ धावा) हे लवकरच बाद झाले.

सूर्यकुमार-तिलकने सावरलं…

मुंबईने सुरुवातीलाच तीन महत्त्वाचे फलंदाज गमावल्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादव आणि तिलकने डावाची सूत्रं हाती घेतली. दोन्ही फलंदाजांनी परिस्थितीनुरूप खेळ करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी खेळी केली. चौथ्या गड्यासाठी दोघांनी ६४ धावांची भागीदारी केली.
२६ धावांवर खेळत असलेल्या तिलक वर्माला जेसन होल्डरने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर सूर्यकुमार यादवही बाद झाला. सूर्यकुमारने २७ चेंडूत ३७ धावा केल्या. मुंबईच्या ५ बाद १२७ धावा झाल्या होत्या. पोलार्डने मुंबईला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्याचे प्रयत्न अपुरे ठरले.

अखेरच्या षटकात पोलार्ड १४ चेंडूत २५ धावा करून बाद झाला. लखनौकडून आवेश खानने सर्वाधिक बळी घेतले. आवेश खानने ४ षटकात ३० धावा देत तीन गडी बाद केले.

लखनौने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली. क्विंटन डिकॉक आणि केएल राहुल यांनी आक्रमक सुरूवात केली. लखनौने पावर प्ले मध्ये डिकॉकची विकेट गमावत ५७ धावांपर्यंत मजल मारली. राहुलच्या सोबतीने खेळणाऱ्या मनिष पांडेनंही काही आकर्षक फटके मारले. मात्र, मोठी खेळी करता आली नाही, ३८ धावा करून तो बाद झाला.
कर्णधार राहुलने तुफान फटकेबाजी करत संघाची धावसंख्या १५व्या षटकातच १५० वर नेऊन ठेवली. राहुलने ५६ चेंडूत शतक झळकावलं. राहुलने १००व्या सामन्यात हे शकत केलं. लखनौने २० षटकात ४ गडी गमावत १९९ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यात मुंबई अपयशी ठरली.

See also  रोहित शर्मा झाला टी-20 नंतर एकदिवसीय संघाचा कर्णधार