पुणे :
महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे. शहर झोपडपट्टीमुक्त करण्याची काँग्रेसची योजना आहे. मॅरेथॉन, नॅशनल गेम, कॉमनवेल, क्रीडानगरी म्हणून पुणे शहराला नावलौकिक मिळवून दिला, त्यातून शहराच्याच नव्हे, तर देशाच्या विकासासाठी काँग्रेसचे मोठे योगदान आहे. मागिल काही वर्षांत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कमी पडलो, मात्र आता ती चूक होणार नाही. भाजपने खोटा प्रचार करून कुटील नीती वापरून फोडाफोडीचे राजकारण केले. त्यामुळे काँग्रेसला फटका बसला. मात्र, आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली नेतेमंडळी, कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक, माजी आमदार आता पुन्हा जोमाने कार्यकर्ते कामाला लागले.
काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता, त्याची आर्थिक परिस्थिती कमी असली तरी, त्याने लोकांना विश्वास मिळविला आहे, त्याला ताकद देऊन त्याची निवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून केली जाणार आहे, असे माजी गृहराज्यमंत्री आणि शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.
मंडई विद्यापीठ कट्टाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी विचारांची देवाण-घेवाण चर्चासत्रामध्ये काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री व शहराध्यक्ष रमेश बागवे, पुणे महानगरपालिका गटनेते आबा बागुल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांना आमंत्रित केले होते. यावेळी महापालिका निवडणुका आणि काँग्रेसची रणनीती या विषयावर साधण्यात आला.
बागवे म्हणाले की, पालिकेमध्ये ज्या ठेकेदार काळ्या यादीमध्ये आहे, त्यालाच पुन्हा काम दिले जात आहे. मागिल पाच वर्षांमध्ये ५८ प्रपोजलमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे, ते नागरिकांना पुराव्यानिशी दाखवून देणार आहोत. पुण्याचा विकास कोणी केला आणि भ्रष्टाचार कोणी केला ही बाब नागरिकांपुढे मांडणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.