मुंबई :
गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत.
गेल्या १ वर्षांपासून कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. या कालावधीत अनेकांना कोरोनाची लागण झाली तर काही जणांनी यामुळे आपले प्राणही गमावले. त्यातच आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्या आधीच अनेक राजकीय नेते विशेषतः महाविकास आघाडीतील मंत्री अचानक कोरोनाग्रस्त होऊ लागले आहेत.
यामुळे या मंत्र्यांना खरा कोरोना होतोय की राजकीय ?
असा सवाल भाजप नेत्यांकडून केला जात आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील भाष्य करत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. लॉकडाऊन आणि निर्बंध टाकण्याचा प्रयत्न करत जसं कोरोनाच्या नावाखाली काहीच करायला नको. तसाच अधिवेशनाबाबत वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप दरेकरांनी केला आहे.
‘वीज खंडीत केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय. त्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय. महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात प्रचंड प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आहे,’ असं म्हणत दरेकरांनी सरकारच्या अपयशाचा पाढाच वाचला आहे.