मुंबई :
महाराष्ट्र मुलींच्या कबड्डी संघाने तामिळनाडू विरूद्ध झालेला सामन्यात नेहमीप्रमाणे एकतर्फी (२३ गुणांनी) विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य सामन्यात त्यांनी अवघ्या साडेचार मिनिटांत तामीळनाडूवर लोण चढवले. तर मुलांचा उत्तर प्रदेशविरूद्ध अटीतटीच्या सामन्यात अवघ्या चार गुणांनी त्यांना पराभव पत्करावा लागला.
हरियाणा येथील ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये सामने सुरू आहेत. स्पर्धेचा चौथा दिवस देखील महाराष्ट्राने गाजवला. यात मुलींनी तामीळनाडूवर एकूण चार लोण चढवले. कर्णधार हरजीतसिंग संधू, यशिका पुजारी, मनिषा राठोड आणि अनुजा शिंदे यांनी चढाईत गुणांची लयलूट केली. उत्कृष्ट पकडी केल्याने तिकडूनही गुण मिळत गेले. पहिल्या हापमध्ये १८ विरूद्ध १३ असा गुणफलक होता. मात्र दुसऱ्या हापमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी आक्रमण वाढवले. त्यावेळी तामिळनाडूचे खेळाडू बोनस गुणांवर भर देत होते. परंतु ते त्यांना विजयासाठी कामी आले नाही. या सामन्यावर महाराष्ट्राने मजबुत पकड निर्माण केल्याने त्यांनी दुसऱ्या हापमध्ये तीनवेळा तामीळनाडूला ऑलआउट केले.
मुलांची अटीतटीची लढत
मुलांच्या कबड्डी संघाचा सामना बलाढ्य उत्तर प्रदेश संघासोबत झाला. यात महाराष्ट्र संघाला अवघ्या चार गुणांनी सामना गमवावा लागला. आता त्यांची लढत हरियानाच्या संघासोबत होणार आहे. या सामन्याकडेही क्रीडाप्रेमींचे लक्ष आहे. दोन्ही संघ विजयाचे दावेदार मानले जातात. सामन्यात पिछाडी भरून काढत महाराष्ट्राने लोण चढवला. मात्र, राजस्थानचे खेळाडू आक्रमक झाले. त्यांनी काही उत्कृष्ट पकडी केल्या. दोन सुपर रेडमुळे सामन्याचा माहोल बदलून टाकत ३० विरूद्ध ३० असा गुणफलक लागलेला असताना उत्तर प्रदेशने केलेल्या चढाया महाराष्ट्रावर भारी पडल्या. दुसऱ्या हापमध्येही उत्तर प्रदेशने एक लोण चढवला. शेवटी महाराष्ट्राने गुण घेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. परिणामी ४१ विरूद्ध ३७ अशी चार गुणांनी हार पत्करावी लागली.