नवी दिल्ली –
देशातील नागरिकांनी कोरोनाला फारच हलक्यात काढले. लोकांकडून होणारे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन आणि सर्वाधिक संसर्गजन्य अशा सार्स-कोव्ह-२ या विषाणूचा प्रसार यामुळे देशातील संसर्ग वाढला असल्याचे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.
लोक या संसर्गाला फारच हलकेपणाने घेऊ लागले आहेत. घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला मार्केट, रेस्टॉरंट आणि शॉपिंग मॉल्स गर्दीने खचाखच भरलेले दिसतील. या सगळ्या गोष्टी विषाणूसाठी सुपरस्प्रेडर ठरल्या आहेत. आता एका व्यक्तीपासून अनेकांना संसर्ग होण्याचे प्रमाण देखील लक्षणीयरित्या वाढले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या संसर्गाला येथेच रोखण्यात आले नाही तर देशातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवर देखील लोकांनी कोरोनाविषयक नियम पाळावेत म्हणून प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी खूप काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यंदा फेब्रुवारी महिन्यामध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असताना लोकांनीही नियमांचे पालन करणे सोडून दिले होते. कोरोनाचा विषाणू निष्क्रीय झाल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती.