सातारा जिल्ह्यातील पाल गावातील पूरग्रस्तांना माजी आमदार विनायक निम्हण मित्र परिवाराच्या वतीने मदत. 

0

पुणे :

राज्यात अतिवृष्टी झाल्याने मागील काही दिवसांमध्ये पावसाने अगदी अनेकांचे संसारच उध्वस्त केलेत. कोकणात घडलेल्या या हृदयपिळवून टाकणाऱ्या काही घटना ज्यात अनेक नागरिकांचे कुटुंब हे जगण्यासाठी संघर्ष करत आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवाजीनगर पुणे चे माजी कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द केले. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पालीच्या खंडोबा असणार्‍या पाल गावात वाढदिवसानिमित्त पूरग्रस्त बाधितांना सनी निम्हण व कार्यकर्त्यांनी शंभर कुटुंबांना मदत म्हणून साहित्याचे वाटप केले. त्यामध्ये धान्य, रेशन किट, कपडे, ब्लँकेट, औषधे तसेच विद्यार्थ्यांसाठी दप्तर, कंपास, वह्या, पुस्तके इत्यादी शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

या वेळी बोलताना माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, 22 ते 24 जुलै या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पाल गावातील नदीच्या दोन्ही बाजूंना असणार्‍या शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच गावकर्‍यांच्या घरात पाणी घुसल्यामुळे अतोनात हानी झाली. या पूरग्रस्त बाधित कुटुंबांना नव्याने संसार उभारण्यासाठी ही मदत देत आहोत. माजी आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करून कार्यकर्त्यांनी या रकमेतून सामाजिक भान ठेवून पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार ही मदत देत आहोत. पूरग्रस्त बाधितांच्या हालअपेष्टा संपून त्यांचे जीवन पूर्ववत सुरू होवो ही खंडोबाचरणी प्रार्थना करतो, असे ते म्हणाले.

 

 

याप्रसंगी बोलताना देवराज दादा पाटील म्हणाले की, अतिवृष्टीने पाल गावाचा फार मोठा भाग पाण्याखाली गेला, मोठे नुकसान झाले, शेतकर्‍यांचेही नुकसान झाले. अशा संकटसमयी कार्यसम्राट माजी आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांवर खर्च न करता सनी निम्हण व कार्यकर्त्यांनी सर्व रकमेतून पूरग्रस्त बाधितांना मदत करण्याचे ठरवले. याबद्दल सारे गावकरी कृतज्ञ आहेत. या मदतीमुळे गावकर्‍यांना मोठा आधार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी देवराज दादा पाटील यांच्या समवेत पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक अमित गावडे, विष्णू काकडे, रोहित किरदत्त, मंगेश घोलप, हृषीकेश निम्हण, अविनाश गायकवाड व इतर पुण्याहून मदत वाटपासाठी आलेले सुमारे 30 कार्यकर्ते होते. पुण्याहून येऊन गावकर्‍यांना घरोघरी मदत पोच केल्याबद्दल अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. श्री खंडोबाचा जयघोष करून या भावस्पर्शी कार्यक्रमाची सांगता झाली.

See also  औंध येथे चोरट्यांना पाहून पोलिसांनी पोबारा केला होता, त्याच चोरट्यांच्या  गुन्हे शाखेने  मुसक्या आवळल्या