मुंबईः
कोरोना संकटामुळे मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत सोमवार १९ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्रातील दहा मानाच्या पालख्या पंढरपूर येथे प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांच्या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बस सज्ज झाल्या आहेत.
हरिभक्तीच्या छंदात दंग होऊन, विठूनामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर कोरोनाचे सावट आहे. आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील दहा मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे.
या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने मोफत शिवशाही बस दिल्या आहेत.
शिवशाही बस मानाच्या पालख्यांचा सोहळा घेऊन सोमवारी पंढरपूरला रवाना होतील. प्रत्येक पालखीसाठी दोन याप्रमाणे दहा मानाच्या पालखी सोहळ्यांसाठी वीस शिवशाही बस सज्ज आहेत. या बस आकर्षक फुलांची आरास करुन सजविण्यात आल्या आहेत. पालख्यांचा मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंतचा प्रवास शिवशाही बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे पायी दिंडीने पंढरपूरला जातील. वारकरी संप्रदायांचा हा प्रवास सुखकर होण्यासाठी शिवशाहीचे चालक योग्य ती खबरदारी घेतील. शिवशाही बसमधून रवाना होणारा पालखी सोहळा आणि वाखरी ते पंढरपूर अशी पायी जाणार असलेली दिंडी यात कोरोना प्रोटोकॉलचे पालन केले जाईल.