पुणे :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी पायीवारी सोहळ्याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन नियमावली जाहिर केली आहे. यंदाही प्रमुख १० पालख्यांनांच परवानगी देण्यात आली आहे. तर विठ्ठलाच्या भेटीसाठी या पालख्यांना एसटीने नेण्यास परवानगी देण्यात आली असल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितले.
यंदा सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी पायी दिसणार नाही. वारकऱ्यांची गर्दी मंदिरामध्ये दिसणार नाही. पालखी सोहळा उत्साहासाठी घराबाहेर पडणाऱ्या वारकऱ्यांनी घरीच आषाढी वारी साजरी करण्याचे आवाहन अजित पवारांनी केलं आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, वारीची परंपरा टिकवण्यासाठी सरकारने मध्यममार्ग काढला आहे. वारकऱ्यांना नाही म्हणणे सरकारलाही आवडत नाही म्हणून बस मधून वारी नेण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. तसंच पालखी सोहळ्यातील प्रस्थाना वेळी आळंदी आणि देहूत १०० लोकांना परवानगी दिलेली आहे. उर्वरित ८ मानाच्या पालख्यांना ५० वारकऱ्यांच्या उपस्थित प्रस्थान करण्यास परवानगी दिली आहे.
दरम्यान, मागील वर्षी पालखी सोहळ्यासाठी १० बसेस दिल्या होत्या. यंदा मात्र प्रत्येकी २ बसेस प्रमाणे १० मानाच्या पालख्यांसाठी २० बस दिल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे पालखी सोहळ्यात सहभागी होणार सर्व वारकऱ्यांना वैद्यकीय चाचणी करणं आवश्यक असणार आहे, असंही अजित पवार बोलताना म्हणाले. शासकीय महापूजेचा कार्यक्रम गेल्यावर्षीप्रमाणे सर्व निर्बंध पाळूनच करण्यात येईल, असंही पवार म्हणाले.
मानाच्या १० पालख्या –
१) संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)
२) संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
३) संत सोपान काका महाराज (सासवड)
४) संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)
५) संत तुकाराम महाराज (देहू)
६) संत नामदेव महाराज (पंढरपूर)
७) संत एकनाथ महाराज (पैठण)
८) रुक्मिणी माता (कौडानेपूर -अमरावती)
९) संत निळोबाराय (पिंपळनेर – पारनेर अहमदनगर)
१०) संत चांगटेश्वर महाराज (सासवड)