एकाबाजूला भारतात कोरोनाचं थैमान सुरू आहे. मे महिन्यात तीन दिवस देशात ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे परदेशांमधून भारताला मदत मिळत आहे. तर भारतातून मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात सुरू आहे. मात्र चीननं घेतलेल्या एका निर्णयाचा फटका संपूर्ण जगाला बसण्याची शक्यता आहे. भारतात मोठ्या प्रमाणात औषधांचं उत्पादन होतं. देशातून जगभरात औषधं पुरवली जातात. परंतु, चीनच्या एका निर्णयामुळे जगभरात औषधांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
चीननं मालवाहू विमानांच्या उड्डाणांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. यासोबतच भारताकडून औषधांची आयात करणाऱ्या देशांसमोरही समस्या निर्माण झाली आहे. अमेरिका औषधांसाठी मोठ्या प्रमाणात भारतावर अवलंबून आहे. भारताकडून औषधं आयात करणाऱ्या देशांची संख्या खूप मोठी आहे. मात्र चीननं कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्यानं भारतातील औषध निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरात औषधांची टंचाई निर्माण होऊ शकते.