औध :
मुळा नदीवर जलपर्णीचे साम्राज्य : औंध, बाणेर परिसरातून वाहणारी मुळा नदी वर जलपर्णीचे साम्राज्य मुळे, तिला मैदानाचे स्वरूप आले आहे आहे. जलपर्णी काढण्याचा दरवर्षी नुसता दिखावा केला जातो. परंतु ही जलपर्णी पूर्णतः निघत नसल्याची खंत मात्र नागरिक व्यक्त करतात.
औंध, बाणेर परिसरातून वाहात असलेल्या मुळा नदीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरलेली आहे की, नदी आहे की मैदान असे स्वरूप प्राप्त झाले आहे. या ठिकाणी मुळा नदी ही ही पूर्णतः दूषित झाली असुन, यामध्ये मोठ्या प्रमाणात मैला पाणी सोडण्यात आल्यामुळे जलपर्णी वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. नदीतील प्रदूषणामुळे औंध, बाणेर, बोपोडी, रोहन निलय, कोळीवाडा, औंध गावठाण, स्पायसर कॉलेज परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. म्हणून औंध काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक कैलास गायकवाड व पुणे शहर युवक काँग्रेसच्या सरचिटणीस अदिती गायकवाड कडू पाटील यांनी बाणेर स्मशान भूमी पासुन बोपोडी पर्यंत नदीलगतच्या सर्व परिसराचे आवर्जून पाहणी केली.
यावेळी पुणे शहर युवक काँग्रेसच्या सरचिटणीस अदिती गायकवाड कडू पाटील यांनी या जलपर्णी संदर्भात नदी मध्ये येणारे दूषित पाणी थांबवले जावे यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे सांगितले. यासाठी वारंवार नदीपात्रातून ड्रेनेज लाईन बाहेर काढण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे. परंतु याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. मुळा नदी प्रदूषण रोखण्या बाबत कोठेही काहीच दखल घेतलेली लक्षात येत नाही, अशी खंत अदिती कडू पाटील यांनी मॅक न्यूज शी बोलताना व्यक्त केली. पुढे त्यांनी सांगितले की, नागरिकांच्या जीवाशी खेळणे थांबवून जर प्रशासनाने वेळीच जलपर्णी काढून नदी स्वच्छ केली नाही तर युवक काँग्रेस च्या वतीने आक्रमक आंदोलन केले जाईल व जलपर्णी अधिकाऱ्यांना भेट देवू असेही त्यांनी सांगितले.
याबाबत माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी सांगितले की, बाणेर व औंध मधील नदी कडेला असलेल्या नागरिकांना दरवर्षी या जलपर्णीचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे दुर्गंधी व डास मोठ्या प्रमाणात परिसरात पसरतात. स्मार्ट सिटी मध्ये ज्या पद्धतीने इतर कामे रंगरंगोटी करून फक्त स्मार्ट केली जात आहेत. त्या पद्धतीने नदीचे काम करता येणार नाही, यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परंतु नदीही स्मार्ट करणे महत्वाचे असून प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे. नुसताच नदीकडेचा परिसर सुशोभित करून काही फायदा नाही. तर नदी मध्ये येणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नागरिक अगोदरच करोना संकटातून जात आहेत त्यात नदी प्रदूषणात भर पडल्याने मच्छर चे प्रमाण वाढल्याने लोकांना डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगांना सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी त्वरित लक्ष घालावे व नदीला प्रदूषणमुक्त करावे अशी मागणी गायकवाड यांनी केली.