पालिकेने नऊ दिवसांत बुजविले ४९९ खड्डे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची मलमपट्टी

0

पुणे :

शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविले जात नसल्याबाबत पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठल्यानंतर पथ विभागाने रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या पावसाने दिलेल्या उघडिपीचा फायदा घेत पालिकेने गेल्या ९ दिवसांत ४९९ पेक्षा अधिक खड्डे बुजविले आहेत. पुढील दोन दिवसांत युद्धपातळीवर काम करून शहरातील सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचा प्रयत्न केला जाणार आहे.

गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आलेला असतानाही शहरातील अनेक रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच असल्याची तक्रार नागरिकांकडून आणि वाहनचालकांकडून केली जात होती. रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, यासाठी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून पालिका आयुक्तांना भेटून निवेदने देण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविले जावेत, असे आदेश पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिले होते. यासाठी गणेशोत्सवापूर्वी पाच दिवस आणि विसर्जनाच्या अगोदर पाच दिवस खड्डे दुरुस्तीची विशेष मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

पालिका आयुक्तांनी केलेल्या सूचनांचे पालन करत पथ विभागाने खड्डेदुरुस्तीस सुरुवात केली आहे. पथ विभागाने नऊ दिवसांमध्ये ४९९ पेक्षा अधिक खड्डे बुजविले असल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, २ हजार ७९५ टन हॉटमिक्सचा (गरम डांबर) वापर करण्यात आला आहे. २६ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या काळात पालिकेच्या पथ विभागाने ६ हजार ६९६ चौरस मीटर रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण केले असून, पुढील दोन दिवसांत उरलेल्या रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त केले जाणार आहेत. ही कामे करताना ४३ चेंबर, तसेच सतत पावसाचे पाणी साचत असल्याच्या दोन जागा दुरुस्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील ज्या प्रमुख रस्त्यांवरून श्री गणेशाची मिरवणूक काढली जाते, त्या मार्गांची पाहणी पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. मिरवणुकीचा कोणत्याही मंडळाला त्रास होऊ नये, यासाठी या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने केली जात आहेत. बहुतांश कामे पूर्ण झाली असून, किरकोळ कामे प्रलंबित असल्याचे पावस्कर म्हणाले.

See also  महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार : रमेश बागवे

पाऊस थांबल्याने रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण केली जात आहे. मिरवणूक जाणाऱ्या मार्गांची पाहणी करून तेथील कामे पूर्ण केली जात आहेत. गणेशोत्सवापूर्वी ही कामे पूर्ण होतील