खारघरच्या घटनेची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांकडून करण्यात यावी : शरद पवार

0

शरद पवार :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबई दौऱ्यावर आहेत. तर त्यांनी (२१ एप्रिल) एका कार्यक्रमादरम्यान खारघरच्या दुर्घटनेमध्ये देखील भाष्य करत सत्ताधारी सरकारवर निशाणा लगावला आहे.

अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला असून त्याची जबाबदारी ही शिंदे फडणवीस सरकारची असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. कडक उन्हात गर्दी जमवून आपल्याला अनुकूल वातावरण करण्याचा डाव शिंदे-फडणवीस सरकारचा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. तर या घटनेची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांच्यामार्फत करावी अशी मागणी त्यांनी केली.

तसंच पक्षाचं शिबीर उन्हाळ्यात घेताना काळजी घेता, मग या ठिकाणी का काळजी घेतली गेली नाही असा सवाल शरद पवार यांनी केला. शरद पवार म्हणाले की, ‘या घटनेची चौकशी आता अधिकाऱ्याच्या समितीकडून करण्यात येत आहे. अधिकारी कितीही प्रामाणिक असला तरी तो राज्य सरकारच्या विरोधात अहवाल देत नाही. त्यामुळे खारघर घटनेची सत्यता लोकांसमोर येणार नाही. त्यामुळे या घटनेची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांकडून करण्यात यावी.’ अशी मागणी पवारानी केली आहे.

दरम्यान, रविवारी (16 एप्रिल) ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम खारघरमध्ये भर दुपारी आयोजित करण्यात आला होता. दुपारी रखरखत्या उन्हात हा कार्यक्रम झाल्यामुळे उपस्थित असलेल्या श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये 14 श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर याबाबत सत्यता सर्वांसमोर आली पाहिजे म्हणून मागणी केली जात आहे.

See also  मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष : भाई जगताप