दक्षिण आफ्रिका :
महिला T-20 विश्वचषकात भारताने स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर 7 विकेट्स राखून विजय मिळवला आहे.
महिला T-20 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सायंकाळी 6.30 वाजता सुरुवात झाली होती. पाकिस्तानने टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या फलंदाजांनी 149 रन्स केले होते. भारतासमोर 150 धावांचे आव्हान होते. याच्या प्रत्युत्तरात भारताने 3 विकेटच्या बदल्यात 151 रन्स केले आहेत.
पाकिस्तानची कॅप्टन बिस्माह मारूफने अर्धशतक करत भारतासमोर 150 रनांचे आव्हान ठेवण्यात मोठा वाटा उचलला होता. भारताच्या जेमिमा रॉड्रिग्सने 53 रन्स केले. शफाली वर्माने 25 बॉलमध्ये 33 रन्स केले.
पण सामना सुरू होण्यापूर्वीच भारताला एक धक्का बसला होता. भारतीय टीमची स्टार फलंदाज आणि उप-कर्णधार स्मृती मंधाना ही या खेळात सहभागी होणार अनेकांची निराशा झाली होती पण भारताने सामना जिंकल्यानंतर उत्साहाचे वातावरण आहे. स्मृती मंधानाला बोटाला जखम झाल्यामुळे तिला या सामन्यात खेळता आले नाही. टीमचे कोच हृषिकेश कानिटकरांनी सामन्यापूर्वी याबाबत माहिती दिली होती.