टोकियो ओलिंपिकची सुरुवात 23 जुलैपासून होत आहे आणि ही स्पर्धा 8 ऑगस्ट रोजी संपेल. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सहा वेळची विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हे भारतीय पथकाचे ध्वजधारक असणार आहेत. याबद्दस भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने(आयओए) माहिती दिली आहे. या दोघांच्या व्यतिरिक्त कुस्तीपटू बजरंग पुनियाला स्पर्धेच्या समारोप समारंभासाठी भारतीय संघाचा ध्वजधारक म्हणून निवडले गेले आहे.
ओलिंपिकमध्ये असे पहिल्यांदाच झाले आहे की, भारताचे प्रतिनिधित्व करणारे दोन ध्वजधारक उद्धाटनावेळी असणार आहेत. मेरी कॉमने यानंतर आपली प्रतिक्रिया दिली की, “हा क्षण माझ्यासाठी खूप मोठा आहे.
कारण ही माझी शेवटची ऑलिंपिक स्पर्धा आहे. माझासाठी हा भावनिक क्षण आहे. या उद्घाटन सोहळ्यादरम्यान संघाचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाल्याचा खरंच मला खूप अभिमान वाटतो. माझी निवड केल्याबद्दल मी क्रीडा मंत्रालय आणि आयओएचे आभार मानते आणि या स्पर्धेत मी पदक मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करेल, असे मी वचन देते.”
10,000 प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित राहतील
टोकियो ओलिंपिक सुरू होण्यासाठी आता एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी बाकी आहे. ही स्पर्धा 23 जुलैपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयोजकांनी खेळांदरम्यान प्रेक्षकांच्या उपस्थिती संदर्भात मोठी घोषणा केली आहे. खरंतर जपानच्या संयोजकांनी टोकियो ओलिंपिक स्पर्धेदरम्यान स्टेडियमच्या क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये स्पर्धा पाहण्यास येण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर सर्व ठिकाणी प्रेक्षकांची मर्यादा निश्चित केली आहे.
परंतु, आयोजकांनी कोणत्याही ठिकाणी जास्तीत जास्त 10,000 प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली असल्याचे स्पष्ट केले आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑलिंपिकमधील प्रेक्षकांची मर्यादा या जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के असेल आणि जास्तीत जास्त 10,000 लोक ही स्पर्धा पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येतील.’
टोकियो ओलिंपिक स्पर्धा मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली होती.