मुंबई:
होम आयसोलेशन मध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कोविड सेंटरची संख्या वाढवण्यात येणार आहे. असं केल्याने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असेलेल रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात. त्यालाही आळा बसेल, असं टोपे यांनी सांगितलं.
लसीकरणासाठी राज्य सरकारने ग्लोबल टेंडर काढले होते. त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं सांगतानाच केंद्र सरकारने लसी आयात कराव्यात आणि राज्यांना पुरवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. 18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण करण्याची जबाबदारी राज्याची आहे. त्यासाठी लागणाऱ्या लसीचे पैसे द्यायलाही राज्य तयार आहे, असंही ते म्हणाले.