नवी दिल्ली:
देशात सलग पाचव्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला. तसेच देशात कोरोनाबळींचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारकडून या पार्श्वभूमीवर जनतेला गंभीर इशारा देण्यात आला आहे. आता जर तुम्ही घरी असलात तरी तुम्हाला मास्क घालण्याची वेळ आल्याची सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.
यासंदर्भातीस माहिती केंद्र सरकारच्या नीती आयोगातील आरोग्य विभागातील सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे. विनाकारण कोरोनाच्या या गंभीर काळात घराबाहेर पडू नका. त्याचबरोबर घरातील सदस्यांनी कुटुंबांसोबत असल्यास मास्क घाला. मास्क घालणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर घरी बोलावू कोणालाही नका, असे पॉल यांनी म्हटले आहे.
ऑक्सिजनचा तुटवडा देशभरातील अनेक राज्यांमध्ये जाणवत आहे. यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेत ऑक्सिजन एक्सप्रेस सुरू केली आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेसची सेवा दिली जात आहे. विशाखापट्टनमनंतर गुजरातमधील हापा येथे असलेल्या रिलायन्सच्या प्रकल्पातून महाराष्ट्रासाठी दुसरी ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल झाली. या तीन ट्रकपैकी दोन ऑक्सिजन ट्रक मुंबई, तर एक पुण्याला पाठवण्यात आला आहे.