गर्भवती वाघिणीस गुहेत कोंडून जिवंत जाळण्यात आल्याची भयानक घटना

0

यवतमाळः

पांढरकवडा तालुक्यात गर्भवती वाघिणीस गुहेत कोंडून जिवंत जाळण्यात आल्याची घटना आज सोमवारी सकाळी समोर आली आहे. या अमानवीय शिकारीने समाजमन सुन्न झाले असून या वाघिणीच्या पोटात चार बछडे असल्याची माहिती समोर येत आहे. वाघिणीच्या पायाचे पंजेही शिकाऱ्यांनी कापून नेले आहेत. जिल्ह्यात एकाच महिन्यात दोन वाघांच्या शिकारीची घटना घडल्याने परिसरात शिकाऱ्यांच्या उच्छाद सुरू असल्याचं बोललं जात आहे.

पांढरकवडा वनविभागांतर्गंत मुकूटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनकक्ष क्र. ३० मध्ये सकाळी गस्तीदरम्यान वनरक्षकाला वाघिणीचा मृतदेह आढळून आला. याठिकाणी नाल्याला लागूनच एक गुहा आहे आणि या गुहेचा वापर ही वाघीण करत होती. गुहेचे प्रवेशद्वार अतिशय छोटे आहे. स्थानिक शिकाऱ्यांनी वाघिणीवर नजर ठेवून तिला गुहेत अडकवून ठेवण्यासाठी बांबू आणि इतर साहित्यासह गुहेच्या प्रवेशद्वारावर आग लावली. ती वाघीण मेली आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी तीक्ष्ण हत्यारांनी तिच्या शरीरावर जखमा केल्या. ती मेल्याची खात्री केल्यानंतर तिचे दोन्ही पंजे कापून नेले.

विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) सुभाष पुराणिक, मुकूटबन वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.जी. वारे, मुख्य वनसंरक्षक वन्यजीव प्रकाश महाजन, मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विरानी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, दिल्ली यांचे प्रतिनिधी यांनी घटनास्थळी भेट दिली व वस्तुस्थिती जाणून घेतली.

ही वाघिण नाल्याला लागून असलेल्या गृहेत मृतावस्थेत आढळून आली. गळ्यात तारेचा फास अडकल्याचे आणि अणुकूचिदार हत्याराने मारल्याचे तसेच गुहेच्या तोंडाशी आग लावल्याचे जाळलेल्या लाकडांवरून निदर्शनास आले. ही चार वर्षीय वाघीण गर्भवती असून तिच्या पोटात चार बछडे होते. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड, वणीचे डॉ. अरुण जाधव, झरीचे डॉ. एस.एस. चव्हाण, मुकूटबनचे डॉ. डी.जी. जाधव, मारेगावचे डॉ. व्ही.सी. जागडे यांनी या वाघिणीचे शवविच्छेदन केले. त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल. या प्रकरणी प्राथमिक वनगुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सहायक वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा) पांढरकवडा हे करीत आहेत. आरोपींचा शोध सुरू असल्याचे संबंधित वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

See also  महाराष्ट्रात करोना वाढण्याची केंद्राच्या तज्ञ समितीने सांगितली कारणे.

महिनाभरात दुसरी घटना

जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्यांमुळे वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अभयारण्याच्या क्षेत्रातून वाघ जंगलाबाहेर पडत असल्याने एकीकडे नागरिकांमध्ये दहशत आहे. असताना शिकाऱ्यांनी या क्षेत्रात पुन्हा लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी झरी आणि आता पांढरकवडा येथील वाघांच्या शिकारी करण्यात आल्याचे या दोन्ही घटनांवरून स्पष्ट होत आहे.