पुणे:
उरवडे येथे लागलेल्या आगीमध्ये अंदाजे 18 कामगारांचा जळून मृत्यू झाला आहे.
18 कामगारांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. त्यात 15 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश होता. रात्री उशीरा सापडलेला मृतदेह महिलेचा की पुरुषाचा याची ओळख पटलेली नाही.
या भीषण आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कामगारांसाठी पंतप्रधान मोदी यांनी, पंतप्रधान सहाय्यता निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना ५० हजारांची मदत घोषित करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
मृत महिला या उरवडे, पिरंगुट, भादस, भालगुडी,करमुळी व पौड येथील रहाणार्या आहेत. त्यांची परिस्थिती गरीबीची आहे. कंपनीत पाणी शुध्दीकरण करणाऱ्या गोळ्यांच्या पॅॅकींगचे काम त्या करत होत्या. आजही हेच काम सुरू होते. त्यावेळी शॉॅर्टसर्कीट झाले. नेमकी याच विभागाला आग लागली. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या महिलांचा मृत्यू झाला.
अर्चना कवडे, संगिता गोंदे, मंगल मोरगाळे, सुरेखा तुपे, सुमन ढेरे, सुनीता साठे, संगिता पोळेकर, माधूरी अंबोरे, मंदा कुलत, त्रिशाला जाधव, सीमा बोराडे, गीता दीवाडकर, शीतल खोपकर, सारिका कुडाळे, धनश्री शेलार अशी महिलांची नावे आहेत.
एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजीस ही कंपनी निंकुज शहा यांच्या मालकीची आहे. सुमारे दहा वर्षापूर्वी ही कंपनी सुरू झाली. पाणी शुध्द करण्यासाठीच्या गोळ्या बनविण्याचे काम येथे होते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून येथे सॅॅनीटायझर बनविले जात होते. पाणी शुध्द गोळ्या करण्यासाठी आरएम १ नावाचे रसायन वापरले जाते. ते अत्यंत ज्वालाग्रही आहे. त्याचे पॅकेजींग सुरू असताना शॉॅर्टसर्कीट झाल्याचा अंदाज आहे.
ज्वलनग्राही रसायनांचा वापरू असूनही नाही फायर सिस्टिम एसव्हीएस ॲक्वा या कंपनीत ज्वलनग्राही रसायनांचा वापर होत होता. मात्र, तरीही या कंपनीत अग्निरोधक यंत्रणा (फायर सिस्टिम) नाही, असा आरोपही मृतांच्या नातेवाईकांनी व जखमी कामगारांनी केला आहे.
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.