मुंबई :
आज भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाच्या प्रकाशन करण्यात आलं. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार आदी भाजप नेत्यांसह महाराज मोरे हे देखील उपस्थित होते.
या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर देखील घणाघात केला आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेच्या महायुतीला बहुमत मिळून देखील काही मतभेदांमुळे शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाऊन महाविकास आघाडीच्या सत्तेची स्थापना केली. या महाविकास आघाडीवर भाजप नेते टीकास्त्र सोडत असतात.
हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असं भाकीत भाजप नेत्यांनी वर्तवलं असून हे सरकार आम्हाला पडण्याची गजर नाही तर ते स्वतःच्या पायात पाय अडकून पडेल असं विधान करणाऱ्या फडणवीसांनी पुन्हा एकदा सत्ता स्थापनेविषयी संकेत दिले आहेत. ‘आपल्याला फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही. फक्त जोपर्यंत विरोधी पक्षामध्ये आहात तोपर्यंत विरोधकांची भूमिका निभावत राहू’ असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.