मुंबई :
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती.
मुंबई, ठाणे वगळता उर्वरित राज्यातील ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. आता राज्यातील कोरोनाचा धोका हा कमी झाला असून १६ जानेवारी पासून देशभरात लसीकरणाला देखील सुरुवात होणार आहे. यामुळे याच महिन्याअखेरीस पाचवी ते आठवीच्या शाळा देखील सुरु होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.नुकतंच शिक्षण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
राज्यातील ५ वी ते ८ वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. शाळा सुरु करताना विद्यार्थी आणि शिक्षक यांनी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे.