मुंबई :
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय व चर्चा झाल्याचे सांगितले. सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बाब म्हणजे वीज दर स्वस्त होणार आहेत. स्मार्ट मीटरबाबत बैठकीच चर्चा झाली. त्यामुळं वीज दर प्रति युनिट एक रुपयाने स्वस्त करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वीज दर सध्या 2 रुपये 16 पैसे आहे, मात्र हेच दर आता 1 रुपये 16 पैसे होणार आहेत, त्यामुळं वीज दर प्रति युनिट एक रुपयाने स्वस्त होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान पोलिसांच्या वसाहतीसाठी मास्टर प्लॅन तयार करणार असून, महाराष्ट्रात पोलिसांना घरं उपलब्ध करुन देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईतील भातसा धरणासाठी 1550 कोटीची मान्यता बैठकीत देण्यात आली आहे. तसेच लोणार संवर्धनासाठी 369 कोटीची निधीला मंजूरी देण्यात आली आहे. व मराठवाड्यातील हळद संशोधनासाठी 100 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, तो म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच घरकुल योजनेतील मुद्रांक शुल्क 1 हजार रुपये करणार आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.