संभाजीराजे छत्रपती यांचे महाराष्ट्रातील सर्व आमदारांना खुले पत्र….

0

कोल्हापूर :

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना खुले पत्र लिहिले आहे. या पत्रातून संभाजी राजे यांनी सर्वच पक्षातील आमदारांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपल्याला मदत करावी असे आवाहन केले आहे.

संभाजी राजे राष्ट्रपती नियुक्त खासदार होते. 3 मे रोजी त्यांचा खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. अशातच राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 10 जून रोजी या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. संभीजी राजे यांनी यापूर्वीच राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, ही निवडणूक लढण्यासाठी अनुमोदक म्हणून दहा आमदारांची आवश्यकता असते. त्यामुळे संभाजी राजे यांनी राज्यातील आमदारांना आपल्या पत्रातून राज्यसभेसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

संभाजी राजे यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबूक अकाऊंटवर हे पत्र शेअर केले आहे. संभाजी राजे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, “महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या 42 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक आणि भाजपला दोन जागांवर विजय मिळविणे शक्य वाटते. उर्वरित एक जागेसाठी कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे या जागेवर अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे आवाहन सर्व राजकीय पक्षांना व अपक्ष आमदारांना करत आहे.”

संभाजी राजे यांनी आपल्या पत्रातून राष्ट्रपती नियुक्त खासदार असताना आपण वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याची भूमिका घेतली असल्याचे म्हटले आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करत मी राजकारण विरहित कार्य करत आलो आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली. संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या व देशाच्या हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केले,” असे संभाजीराजे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

See also  पर्यटनविकास होऊन रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संतांच्या विचारांची बैठक असणारा हा महाराष्ट्र या विचारांवरून ढळू नये, यासाठी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत मी झटत राहिलो. परंतु, लोकहिताची कामे करण्यासाठी सत्तापद हाती असणे हे किती सोयीस्कर असते, हे खासदाकीच्या कारकिर्दीत माझ्या लक्षात आले. त्यामुळे राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर मी दावा करत आहे. यासाठी मला सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे.” असे संभाजीराजे यांनी आमदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

https://twitter.com/YuvrajSambhaji/status/1526534381837471744?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1526534381837471744%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F