मुंबई :
‘जर अद्यापही राज्यकर्त्यांनी धडा घेतला नाही तर पुढचा कार्यक्रम आपण एकत्र बसून करु आणि त्यांना उलथून कसं टाकायचं याचा विचार करु.’ असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे.
सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांबात केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं होतं. याच मोर्चात भाषण करताना शरद पवार यांनी राज्यपाल कोश्यारी आणि भाजपवर तुफान हल्ला चढवला.
महाविकास आघाडीचे सगळे दिग्गज नेते हे यावेळी रस्त्यावर उतरुन मोर्चात सहभागी झाले आणि नंतर ते सभास्थळी पोहचले. पण शरद पवारांचं वय आणि प्रकृती यामुळे त्यांनी मोर्चात न जाता सरळ सभास्थळ गाठलं. मात्र, यावेळी पवारांनी आपल्या भाषणातून मोर्चेकऱ्यांनी सरकारविरोधात कठोर भूमिका घ्यावी असं आवाहन केलं.
छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांनी महाराष्ट्र उभा आहे त्याच विचारांना राज्यपाल सारखे व्यक्ती अपमानास्पद बोलत असतील तर त्यांना पदावर राहण्याची आवश्यकता नाही.केंद्राने त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले, ” महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल मी कधीही पाहिला नाही. मला विधान भवनात जाऊन 55 वर्षे झाली अनेक राज्यपाल मी पाहिले. तत्कालीन राज्यपालांनी महाराष्ट्राच नावं लौकिक वाढवण्याचे काम केले. मात्र, हे राज्यपाल सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. या देशात अनेक राजे-रजवाडे होऊन गेले. पण साडेतीनशे वर्ष झाली तरीही सामान्य माणसाच्या मनात एक नाव कायम राहिलं आणि ते म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवछत्रपती. शिवाजी महाराजांच्याबाबत उल्लेख राज्याचा मंत्री करतो. पण महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही. यासंबंधीची तीव्र भावनाचा व्यक्त करण्यासाठी लाखोंच्या संख्येने इकडे तुम्ही जमा झाले आहेत.” असं पवार म्हणाले.