केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोण….?

0

मुंबई:

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा सदस्य  नारायण राणे  यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी आशा असून राणे तातडीने आजच दिल्लीला रवाना झाले आहेत. राणे हे दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत असून राणेंचे मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, याचे उत्तर तूर्त गुलदस्त्यात आहे. दरम्यान, राज्यातून खासदार  प्रीतम मुंडे  यांचे नावही मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

करोना स्थितीमुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार सातत्याने लांबणीवर पडला आहे. आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाचपणी सुरू केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना डच्चू, काही नव्या चेहऱ्यांची वर्णी तर काही मंत्र्यांचा खातेबदल केला जाण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच  भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री  अमित शहा  यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता मंत्र्यांचे प्रगतीपुस्तकही तपासले जाणार असून त्याआधारावर विस्ताराला अंतिम रूप दिलं जाणार आहे.

राजधानीत या हालचाली सुरू असतानाच इच्छूकांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात महाराष्ट्रातून नारायण राणे आणि प्रीतम मुंडे ही दोन नावे चर्चेत आली आहेत. राणे हे मंत्रिपदाबाबत आधीपासूनच आशावादी आहेत. त्यात अमित शहा सिंधुदुर्ग येथे आले होते तेव्हा त्यांनी राणे यांच्या कार्याचा गौरव केला होता. ‘भाजपमध्ये नारायण राणे यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांचा सन्मानच होईल’, असे सूचक विधान शहा यांनी केले होते. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसोबतच राणे यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मुख्य म्हणजे राणे हे आजच दिल्लीला रवाना झाले असून ते जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याचे कळते. याबाबत राणे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र शिवसेनेला शह देण्यासाठी तसेच मराठा नेता म्हणून राणे यांच्या नावाचा विचार मोदींकडून होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या डॉ. प्रीतम मुंडे यांचे नावही मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. बीडमधून त्या दोन वेळा निवडून आल्या आहेत. मतदारसंघातील विकासकामांच्या जोरावर त्यांचं पारडं जड मानलं जात आहे.

See also  उजनी जलाशयात उपद्रवी, घातक असलेले सकर मासे सापडू लागल्याने मासेमारांची चिंता वाढली.