बालेवाडी :
नवरात्री म्हणजे नारी शक्तीचा जागर, नारी ही निसर्गाचे रूप मानली जाते. निसर्गातील वेगवेगळ्या रंगांची मुक्त उधळण नारीच्या स्वभावात दिसते. नारीशक्तीचे प्रतिक असलेले विविध रंगांची नवरात्रीत उधळण केली जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रभाग क्रमांक ९ आणि बालेवाडी वूमन्स क्लब ने या वेळी डॉ. सागर बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्री अनोख्या पद्धतीने साजरी करायचे ठरवले आहे. डॉ. सागर बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये नवरात्रीचे नऊ दिवस ‘नऊ दिवस नऊ नारीशक्ती’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाची माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक ९ च्या प्रा. रूपाली बालवडकर यांनी सांगितले की, विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या, कोणत्याही कामाला कमीपणा न मानता काम करणाऱ्या आणि कुटुंबाचा, समाजाचा आणि जगाचा गाडा कार्यरत ठेवणाऱ्या नारी शक्तीचा सन्मान नवरात्रीचे नऊ दिवस ‘नऊ दिवस नऊ नारीशक्ती’ या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. नारी शक्तीच्या योगदानाला सलाम करून आपल्या या लाडक्या सख्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्देश या मागे आहे.
या उपक्रमाअंतर्गत पहिला दिवशी ज्यांच्याशिवाय महिलांचा कोणताच मोठा सभारंभ पूर्ण होऊ शकत नाही आणि आपल्या जादुई कारागिरीने महिलांचे सौंदर्य अधिक खुलवणाऱ्या बालेवाडी, बाणेर, सुस, म्हाळुंगे भागातील ‘ब्युटीशियन’ सखींचा सन्मान करण्यात आला.
तसेच दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मार्केटयार्ड मध्ये टेम्पोने जाऊन भाजी विकत आणायची आणि लोक मॉर्निंग वाॅकला बाहेर पडायच्या आधी त्यातली चांगली भाजी निवडून विकायला ठेवायची. भाज्यांचे भाव-खालीवर झाले, गिऱ्हाईकाने एक-दोन रुपयासाठी घासाघीस केली तरी त्याच्या पिशवीत वरून आले-कोथिंबीर प्रेमाने टाकायची. असे काबाडकष्ट करून आपले घर पोसायचे, मुलाबाळांना शिकवायचे, ज्यांच्यामुळे आपल्या ताटात अन्न पोहचते. अशा आमच्या भाजीविक्रेत्या सखींना सलाम करत त्यांचा सन्मान राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रभाग क्रमांक ९ आणि बालेवाडी वूमन्स क्लब यांच्या ‘नऊ दिवस नऊ नारीशक्ती’ या उपक्रमात करण्यात आला.
या वेळी सरला बाबुराव चांदेरे, प्रा. रुपाली बालवडकर, मीना विधाळे, प्राची सिध्दीकी, राखी श्रीवास्तव, मानसी पाटील आणि मित वीज यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.