शहरात ९ ते१४ ऑगस्ट दरम्यान ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान

0

पिंपरी  :

पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग घेऊन ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान उत्साही स्वरूपात नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान 9 ते 14 ऑगस्ट 2023 पर्यंत राबविले जाणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात मिट्टी को नमन, वीरों को वंदन हे अभियान संपूर्ण देशात राबविण्याच्या अनुषंगाने आज महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमाचे महानगरपालिका समन्वयक तथा उप आयुक्त मिनीनाथ दंडवते, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, किरणकुमार मोरे, उमेश ढाकणे, शितल वाकडे, सीताराम बहुरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक उद्यान अधिक्षक मंजुषा हिंगे आदी उपस्थित होते.

प्रत्येक राज्यामध्ये गाव ते शहरांपर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शुरविरांचा सन्मान व्हावा याकरिता मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये विविध उपक्रमांचा समावेश आहे.

या उपक्रमांतर्गत शहरातील संस्मरणीय अशा एका ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करणे, महानगरपालिका हद्दीतील प्रभागनिहाय एक किंवा दोन मूठ माती घेऊन त्यातून शहराचा कलश तयार करून तो सन्मानपूर्वक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरावरील समन्वयक अधिकारी यांच्याकडे सोपविणे असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी करून घ्यावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी केले.

See also  पुणे-पिंपरी चिंचवड शहरे एक ऑगस्ट पासून मेट्रोने जोडली जाणार

महापालिका कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि सुरक्षेसाठी बलिदान केले अशा सरंक्षण दल, निम संरक्षण दल, पोलीस दलातील शहिदांच्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा तसेच आजी किंवा माजी सैनिकांचा सन्मान महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.

शहरवासीयांनी प्रतिज्ञा घेण्याबाबत शासनामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत तर महापालिकेच्या वतीने शहरातील योग्य अशा एका ठिकाणी कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायन व ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी दिली.