मुंबई :
शिवसेनेच्या काही बंडखोर आमदारांमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते.काल अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे या वादावर पडदा पडला.आता शिंदे गट व भाजप लवकरच सत्ता स्थापन करणार आहेत.यामुळे,सोशल मिडियावर मंत्रिपदाच्या याद्या देखील व्हायरल होऊ लागल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाबाबत महत्वाचे ट्विट केले आहे.भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रिपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही,लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका,असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार,धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण,महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामे हाच आमचा फोकस असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले असून आता येत्या काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता देखील राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.याच दरम्यान, मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.