मुंबई :
भारताचा विकासदर चालू आर्थिक वर्षात मध्ये 7.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. आशियाई विकास बँक च्या वतीने हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
येणाऱ्या काळात भारताला आपला विकास दर सुधारण्याच्या चांगल्या संधी निर्माण होतील असे देखील बँकेने म्हटले आहे. तर दुसरीकडे चीनचा विकास दर मात्र 5 च्या आसापास राहिल असा अंदाज आशियाई विकास बँकेने वर्तवला आहे. पुढील आर्थिक वर्षात मध्ये भारताचा विकास दर आठच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे, तर चीनच्या अर्थव्यवस्थेत आणखी घसरण होऊ शकते असे देखील बँकेने म्हटले आहे. कोरोना निर्बंध उठवल्याने भारतीय अर्थव्यवस्था गती पकडत असून, अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचे निरीक्षण देखील बँकेने नोंदवले आहे. तसेच कोरोना काळात ठप्प असलेल्या आयात, निर्यातीमध्ये देखील वाढ झाली आहे.
भारतासमोरील प्रमुख समस्या
भारताच्या विकास दराबाबत बोलताना बँकेने म्हटले आहे की, सध्या भारतासमोरील मुख्य समस्या ही महागाई आहे. कच्च्या तेलापासून ते खाद्य तेलापर्यंत आणि सोन्यापासून ते चांदी पर्यंत सर्वच वस्तुंचे भाव वाढले आहेत. अन्न-धान्याचे भाव देखील वाढले आहेत. त्यात आता आणखी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाची भर पडली आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव जागतिक स्थरावर वाढत असल्याने भारतात इंधनाचे भाव वाढू शकतात. महागाईवर नियंत्रण मिळवणे हे देशापुढील सर्वात मोठे आव्हान असेल.
निर्बंध हटवल्याने विकासाला चालना
देशात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट होते. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन लावण्यात आले. लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प झाले. उद्योगधंदे ठप्प झाल्याने अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले होते. अर्थव्यवस्था कोलमडली होती. मात्र आता कोरोनाच रुग्ण कमी झाल्याने निर्बंध हटवण्यात आले आहेत. निर्बंध हटवण्यात आल्याने पुन्हा एकदा उद्योगधंदे नव्या जोमाने सुरू झाले असून, अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असल्याचे देखील आशियाई विकास बँक म्हटले आहे.