औरंगाबाद :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यातील सर्व सामन्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. १५०० स्वेअर फुट बांधकामाला आता परवानगीची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या बांधकामाला परवानगी आवश्यक आहे, ती केवळ १० दिवसात मिळेल असेही ते म्हणाले. औरंगाबाद दौऱ्यावर आले असता त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला, त्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
नगरविकास विभागाच्या वतीने बांधकाम परवानाबाबत हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे राज्यातील लोकांना मोठा फायदा होणार आहे. या निर्णयानुसार १५०० स्वेअर फुटापर्यंत बांधकाम करण्यासाठी यापुढे महानगर पालिकेची परवानगी घेण्याची आवश्यकता नसेल. या बरोबरच यापुढे अनधिकृत झोपडपट्टी होऊ नये या साठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी चव्हाण यांचे कौतूक : औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये चांगले काम केले आहे. त्याप्रमाणे ते औरंगाबाद इथे काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. औरंगाबाद शहरातील ५५ हजार घरे नियमित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.