पुणे :
पुणेकरांना आता रिक्षाने प्रवास करताना आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण पुण्यातील रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. पुणेकरांना आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी 4 रुपये आणि त्यापुढील किलोमीटरसाठी 3 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
1 सप्टेंबरपासून नवीन दरवाढ लागू होणार आहे. गेल्या 10 वर्षातील ही तिसरी रिक्षा भाडेवाढ आहे. इंधन आणि सीनजी दर वाढीमुळे रिक्षावाल्यांनीही दरवाढीची मागणी केली होती. आरटीओ, रिक्षा संघटना आणि कलेक्टरच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
सीएनजीचे दर वाढल्याने भाडेवाढ करण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली होती. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना गणेशोत्सवात खिशा आणखी खाली करावा लागणार आहे. नागरिकांना रिक्षात बसल्यानंतर आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी २५ रुपये तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 17 रूपये मोजावे लागणार आहेत.
पेट्रोल आणि डिझेल नंतर सीएनजीच्या दरात देखील वाढत होत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी भाडेवाढ करण्याची मागणी धरली होती. त्यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने अखेर भाडेवाढीचा निर्णय घेतला.
पुण्यात जवळपास 90 हजाराहून अधिक रिक्षा धावतात. प्रदूषण रोखण्यासाठी सीएनजीवर भर दिला जात आहे. तसेच रिक्षाचालकांना देखील सीएनजीवर रिक्षा चालवणं पेट्रोलपेक्षा परवडतं. रिक्षा चालकांना 91 रुपये प्रति किलो दराने सीएनजी मिळतो.
संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळं पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती इथं ही रिक्षा भाडेवाढ लागू होणार आहे. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य प्रवाशांवर होणार असून त्यांच्या खिशावर आणखी ताण येणार आहे.